Friday, November 25, 2016

निकोला टेस्ला एक महान वैज्ञानिक






निकोला टेस्ला 

बऱ्याच लोकांना निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाबद्दल जास्ती माहितीच नाही, फार कमी लोकांना त्याच्या अविष्काराबद्दल माहिती आहे. जे कोणी त्या बद्दल बोलतात, लिहतात ते निकोलाचा उल्लेख एक वेडा , सनकी शास्त्रज्ञ म्हणून करतात पण ते हेही मान्य करतात कि आजचे प्रगत विज्ञान आहे त्यात त्याचा मोठा वाटा आहे , तो एक खरोखरच महान असा शास्त्रज्ञ होता ,पण त्यांचे कार्य आणि प्रयोग यांचे योग्य श्रेय त्याला  मिळाले नाही. अर्थात त्याला त्याचा अव्यवहारी स्वभाव, प्रसिद्धी पासून दूर पळ काढणे, एकाकी जीवन जगणे हे कारणीभूत आहे.  आठ भाषा अवगत असलेला , २६ देशात जवळपास  ३०० च्या वर पेटंट आणि असे कित्येक अविष्कार  ज्यांचे  पेटंट घेतलेले नाही अश्या ह्या  शास्त्रज्ञा बद्दल थोडक्यात जाणून घेऊया त्याच्या कामाविषयी, वेगवेगळ्या संशोधनाविषयी आणि त्याच्या जीवनाविषयी. 

निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाचा जन्म  मिलुटीन टेस्ला आणि ड्यूका टेस्ला ह्या सर्बियन (सर्बियन  लोक हे दक्षिण स्लाव जमाती मध्ये मोडतात , हि जमात बाल्कन(दक्षिण-पूर्वी यूरोप) प्रदेशमध्ये आढळते) माता पित्याच्या घरी १० जुलै १८५६ मध्ये ऑस्ट्रियन (साध्याच क्रोएशिया )मध्ये झाला होता. पाच अपत्यांपैकी  निकोला हे चौथे अपत्य ! लहानपणापासूनच हुशार असलेल्या निकोलाचे प्रायमरी शिक्षण १८६२ मध्ये पूर्ण केलं.
अद्वितीय बुद्भिमत्ता असलेल्या निकोलाने सण १८७३ मध्ये चार वर्ष्याचे  शिक्षण ३ वर्ष्यातच  संपवले होते.
पुढे  १८७५ ला पॉलीटेक्नीक ला द्वितीय वर्षाला अति हुशारीपणामुळे एका शिक्षकामध्ये आणि टेस्लामध्ये मतभेद झाले आणि त्या वर्षी ते  नापास  झाले, त्यातच त्याला जुगार खेळायची सवय लागली. महिन्याला मिळणारा  भत्ता आणि ट्युशन फी त्यांनी जुगारात उडवली, अभ्यास झाला नाही , आणि ते  फायनल ला नापास झाले , त्यांचे  युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन अपूर्ण राहिले.
 
पुढे ते  १८८१ मध्ये अंडर कॅन्स्ट्रक्शन, असलेल्या  बुडापेस्ट मध्ये एका बुडापेस्ट टेलिफोन एक्स्चेंज कंपनीत मुख्य विद्युत अभियंता म्हणून नोकरीला लागले. इथे काम करत असताना केंद्रीय संचार उपकरणांत नवीन शोध लावून उपकरणे सुधारित केली आणि नवीन स्वरूपातला टेलिफोन एम्प्लीफायर बनवले पण त्याचे त्यांनी कधीच पेटंट घेतले नाही. 
पुढे ते   १८८२ मध्ये थॉमस अल्वा एडिसन ह्यांच्या फ्रांस मधील कॉंटिनेंटल एडिसन कंपनीत विद्युत उपकरणे डिझाइन करणे आणि improve करण्याचे काम करू लागले . पुढे १८८४ ला तेथून त्यांची बदली न्यूयॉर्क , (अमेरिका) मध्ये झाली.  या दरम्यान त्यांनी काही वेगळ्या प्रकारचे डायनमो विकिसत केले. तेव्हा त्यांना थॉमस अल्वा एडीसन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.

 एडिसन ने टेस्ला ला त्यांचा  डायरेकट करंट जनरेटर (DC Generator )  जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला होता. एडिसन यांनी टेस्ला यांना सांगितले की जर ते या कामात यशस्वी झाले तर त्यांना ५०,००० डॉलर बक्षीस म्हणून मिळतील. टेस्ला यांनी एडिसनला हवे तसे बदल  करून दाखवले, परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. त्यांनी टेस्ला यांची चेष्टा केली आणि पगारवाढ हि दिली नाही तेव्हा रागाने टेस्लानि एडिसन ची कंपनी  सोडली. 

एडिसन यांची कंपनी सोडल्यानंतर १८८६ मध्ये त्यांनी दोन Investors सोबत आपली स्वतःची
 Tesla Electric Light and Manufacturing  अशी कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये त्यांनी डायनेमो इलेक्ट्रिक मशीन कम्युटेटर तयार केला. अमेरिकेतील हे त्यांचे पहिले पेटंट होते. पुढे त्यां Investors सोबत हि त्याचे पटले नाही, त्यांनी टेस्ला ला कंपनीतून बाहेर काढले. पुढची काही दिवस अगदीच हालाकीत गेली.


१८८७ च्या काळात परत नवीन Investors सोबत कंपनी स्थापना केली, इथं ते  मोटर आणि जनरेटर वर काम करू लागले होता. त्याच काळात त्यानी  Alternative Current (AC ) वर चालणारी Induction Motor बनवली होती. 
हा तोच काळ होता जिथं एडिसन चा DC Current आणि टेस्ला चा AC  Current ह्यावर मोठं व्यावसाईक युद्ध सुरु झालं. दोघेही आपापले Current कसे चांगले आणि दुसऱ्याचे कसे खराब आहे हे सिद्ध करून दाखवू  लागले,  एडिसन ने AC  Current  चे  भय उत्पन्न करण्यासाठी  चक्क एका हत्तीला लोकांच्या समोर विजेच्या शॉक देऊन मारला  आणि AC ची विनाशकारी शक्ती आहे हे लोकांना प्रात्यक्षिक दाखवल.

परंतु  AC  Current चे वैशिष्ट्य असे की याचे वोल्टेज ट्रांसफोर्मर द्वारा वाढवून खुप दूर पर्यंत पाठवता येऊ शकत होत . DC मध्ये असे करता येत नाही. त्याच बरोबर AC प्रणालीवर चालणारी उपकरणे DC उपकरणांच्या तुलनेत कमी वीज वापरतात. प्रत्येक घरात्त वीज ही केवळ AC प्रवाहानेच पोहोचू शकत होती. त्यामुळे शेवटी टेस्ला यांचाच विजय झाला.

त्या वेळी DC system प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागू होती आणि एडिसन कंपनी DC उपकरनेच बनवत होती, त्यामुळे एडिसन ने या नवीन पद्धातीला विरोध केला. टेस्ला ने उद्योगपति जॉर्ज वेस्टिंग हाउस याच्या सोबत नवीन कंपनी चालू केली. या कंपनीने AC प्रणालीचे महत्त्व जगाच्या समोर ठेवले. आज आपल्या घरी खांबा वरून जी वीज येते ती टेस्ला यांची AC प्रणाली आहे.

टेस्ला यांनी चक्रीय चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांताचा शोध लावला. त्यांचा एक आणखी महत्वपूर्ण अविष्कार म्हणजे  AC Electric Motor आहे . त्यानी ह्या मोटार च्या साह्याने नायगरा धबधब्यावर पहिले जल विद्युत पावर स्टेशन (Water electric power station) तयार केले, त्या नंतर केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानेच AC विद्युत वितरण प्रणालीचा स्वीकार केला.

१८९१ मध्ये टेस्ला यांना अमेरिकेची न्यूट्रलाइज नागरिकत्व  मिळाले . त्याच काळात टेस्ला यांनी  wireless power transmission ने वायर विरहित अंतरावर ठेवलेले ब्लब पेटवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते.
Hollywood मधील  The Prestige ह्या चित्रपटात टेस्ला ह्यांची wireless power transmission सोबत अनेक शोध दाखवले आहेत.  ह्याच काळात टेस्ला कॉईल चा शोध लागला. 


असे मानले जाते की टेस्ला यांनी  १८९४ मध्ये Invisible Energy (आताचे क्ष किरण ) किरणांचा शोध लावला होता . परंतु १८९५ ला त्यांच्या प्रयोगशाळेत लागलेल्या आगीत शेकडो संशोधन मॉडेल , डिजाईन, नोट्स , फोटोस  सर्व कागदपत्र आणि उपकरणे जाळून खाक झाले.  ह्यामागे एडिसन चा हात होता असं म्हणतात

Radio Wave शोध:
टेस्ला ने रेडियो तरंग (Radio Wave) चे ट्रान्समिशन करता येते ह्या थेअरीज १८९३ मधेच  मांडल्या होत्या. वातावरणाच्या बाहेर  रेडियो लहरी संपूर्ण जगात कोठेही पाठवता येऊ शकतात असा सिद्धांत मांडला. रेडियोत वापरत असलेला टेस्ला रॉड त्यांनीच शोध लावलेला आहे, ह्याचे सादरीकरण करताना त्यांनी Radio Wave Controller वापरून एका बोटीला चालवून दाखवले, हा विषय लोकांमध्ये खूप कुतुहूल करणारा ठरला होता, लोकांना वाटायचे हा जादू आहे, टेलिपॅथी आहे किंवा ह्या बोट मध्ये प्रशिक्षित माकड लपवले आहे. 

 पण पुढे मार्कोनी नावाच्या संशोधकाला अश्याच Radio Wave Transmission बद्दल पेटंट मिळाले, ह्यावर टेस्ला आणि मार्कोनी ह्यांच्यात पेटंट युद्ध सुरु झालं कोर्टात  खुप काळ खटला चालला पण पेटंट  मार्कोनी यांना मिळाले.  सध्या मार्कोनी याला रेडियोचा जनक मानले जात असले तरी सत्य असे आहे की या शोधात टेस्ला यांचेही तितकेच योगदान लाभले आहे.

 १८९९ ला त्यांनी Wireless Telegraphy  चा शोध लावला त्याच सोबत कृत्रिम .वीज निर्मिती सुद्धा केली.  एका प्रयोगामध्ये त्यानी लाखो वोल्ट ताकदीची आकाशातील वीज निर्माण केली.  त्या विजेची गडगडाहट एवढा मोठा होता कि २५ किलोमीटर पर्यंत लोकांना ऐकू येत होता.  ह्या प्रयोगा दरम्यान लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. 

त्यानी  पुढे हा पण दावा केलाय कि Wireless Telegraphy प्रयोगा दरम्यान उभा केलेल्या रिसीव्हर टॉवर मधून काही अज्ञात सिग्नल मिळाले होते जे कि त्याच्या मते एखाद्या परग्रहावरून एलियन्स ने धाडले होते.

ज्या कामासाठी इन्वेस्टर्स नि पैसा लावला होता ते काम न करता टेस्ला नि दुसरेच शोध लावले होते त्यामुळे ह्या इन्वेस्टर्स  लोकांनी त्याची लॅब बंद पाडली.  

१९०६ ला ५०व्या वाढदिवसाला  त्याने ब्लेड नसलेल टर्बाईन बनवले त्याचा वापर करून त्यानी  कोलोराडो धबधब्यात  पॉवर स्टेशन बसवले.
१९१२ मध्ये ब्रेनला  इलेकट्रीक शॉक देऊन ब्रेन अधिक क्रियाशील करण्याच्या थेअरी त्यानी  मांडल्या, त्यावर काही प्रयोगही  हि केले. 
१९१७ मध्ये त्यानी आताच्या रडार प्रणाली सारखी 'इलेक्ट्रिक रे' हि  प्रणाली पाणबुडी शोध घेण्यासाठी मांडली होती पण तो त्यातील काही गोष्टीत चुकीचा ठरला.

टेस्लाने Death Ray ह्या मशीनचा शोध लावल्याचा दावा केला होता, त्याच्या दाव्यानुसार जवळपास ३००किलोमीटर दूर बॉर्डर वरून जमिनीवरून  हवेमध्ये असे काही किरणे सोडायचे  कि  त्याने शत्रूची १० हजार फूट उंचीवरील विमाने खाली पाडणे शक्य होतील .

संपूर्ण आयुष्य अविवाहित राहणाऱ्या आणि अर्ध्याहून अधिक काळ हॉटेल मध्ये जीवन जगणाऱ्या  ह्या अवलियाचा जानेवारी १९४३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मृत्यू विषयी अनेक चर्चा, मतभेद, तर्क सुरु राहिले. काहींच्या मतानुसार त्यांचा मृत्यू हा संशयास्पद होता, त्यांच्या मृत्यू पश्चात अमेरिका सरकारने त्यांचे संशोधन आणि उपकरणे स्वतःच्या ताब्यात घेऊन सर्व सामान्य जनतेपासून लपवून ठेवली आहेत. काही  म्हणतात की त्यांचा मृत्यू हा केवळ अमेरिकन सरकारचा एक बनाव होता आणि त्यानंतर ते अनेक वर्ष गुप्तपणे अमेरिकन सरकार साठी काम करत राहिले.आज हि बरेच असं  देखील मानले जाते की टेस्ला यांचे अनेक प्रयोग अमेरिका सरकान ने लुप्त केले आहेत.


 निकोला टेस्लाच्या स्मरणार्थ अमेरिका १० जुलै हा दिवस टेस्ला दिवस म्हणून साजरा करते. टाईम मासिकाने  त्यांच्या ७५ व्या Birthday ला,  आपल्या Cover Page वर त्यांना स्थान दिले होते. या मुहूर्तावर ७० महान वैज्ञानिकांनी त्यांची प्रशंसा केली होती. ह्या कार्यक्रमाला आईनस्टाईन देखील होते. भौतिक चुंबकीय क्षेत्राला त्यांच्या नावावरून टेस्ला हे युनिट देण्यात आल. त्याच्या नावाने काही अवॉर्ड्स सुद्धा मिळतात. १९५६ मध्ये टेस्ला सोसायटीची स्थापना हि झाली.  चंद्रावर पृथ्वी पासून दूर असलेल्या एका २६ किलोमीटर व्यासाच्या क्रेटर ला टेस्ला नाव देण्यात आले आहे. एका सूक्ष्म ग्रहाचे नाव २२४४ टेस्ला ठेवण्यात आले आहे. सर्बियाच्या बेलग्रेड विमान तळाचे नाव टेस्ला आहे,  सर्बियाच्या  विद्युतगृहाचे नाव टेस्लाच्या नावावरून देण्यात आले आहे. अमेरिकेत विद्युत कार निर्माण करणाऱ्या कंपनीचे नाव टेस्ला मोटर्स आहे, त्यांच्या नावे टेस्ला पुरस्कार दिला जातो. बेलग्रेड इथे निकोला टेस्ला संग्रहालय देखील आहे. वॉशिंग्टन मध्ये त्यांच्या नावे काही शाळा, महाविद्यालये आहेत सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे. नायगरा फॉल वरती टेस्ला यांचा मोठा पुतळा आहे


Sunday, November 20, 2016

आर्थिक नियोजन

 आर्थिक नियोजन


काळा पैसा आणि वाढलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी भारत सरकारने ५००  आणि १००० च्या नोटांचे विमुद्राकरण केले, आणि देशात एकच खळबळ उडाली, अशी खळबळ उडणं साहजीक होते. ह्यातून आपण काय शिकण्यासारखं आहे? अशीच आर्थिक परिस्थिती छोट्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाच्या वैयक्त्तिक आयुष्यात उद्भवली तर काय होईल ? अश्या वेळी तारांबळ उडू नये म्हणून कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे?
ह्यावर उत्तर एकाच, आर्थिक नियोजन करणे आणि समृध्द जीवन जगणे. 

आर्थिक नियोजन करणे म्हणजे नेमके काय करणे?
  
 आपल्या गरजा, ध्येय,  उद्दिष्टे यांची कालावधीनुसार वर्गवारी करून त्यानुसार तरतुदीचे नियोजन करणे म्हणजे आर्थिक नियोजन करणे होय. 

 आर्थिक नियोजन का करावे?
प्रत्येकाच्या आयुष्यात काहींना काही चढउतार होत असतात आणि त्यामुळे आपल्यासमोर आर्थिक संकट उभे राहतं , अशी संकटे व्यवसायात , कुटुंबात येऊ शकतात जर आपले पुरेसे आर्थिक नियोजन नसेल तर आपली खूप हानी होऊ शकते, कर्जबाजारीपणा येऊ शकतो हे होऊ नये म्हणून सर्वांनी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.   
प्रत्येकाने  स्वतःचे आर्थिक नियोजन केलेच  पाहिजे. आर्थिक नियोजन हा विषय क्लिष्ट अगदीच नकोसा वाटणारा आहे .आर्थिक नियोजन जेवढया लवकर सुरु कराल तेवढं फायद्याचं आहे. तरुणांनी  शिस्त लावून घेतल्यास पुढील काळात  ह्याचे फायदे  नक्की मिळतील . हे आर्थिक नियोजन कसं करावं, खर्च कसे मॅनेज करावेत, गुंतवणूक कुठे करावी हे आपण बघूया.

बर्याच अर्थतज्ञ्  लोकांनी आर्थिक नियोजन करताना सर्वसाधारण पणे काही महत्वाचे मुद्दे मांडले माझ्या वाचनात आले आहे ज्यावर आर्थिक नियोजन अवलंबून असते ते म्हणजे  वय, उत्पन्न,  उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता, अपेक्षित रिटर्न, आणि उपलब्ध शिल्लक. आणि बरेच  आहेत पण वर दिलेली काही प्रमुख आहेत. 

आर्थिक नियोजनाची  करावयाच्या तीन पायरी संकल्पना मी मांडतोय,

  1. जीवन विमा - Life Insurance  आणि आरोग्य विमा - Health Insurance 
  2. सेविंग्स (Fund Saving ). 
  3. गुंतवणूक (Investment ) 

 आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे प्रत्येकाचा जीवन विमा - Life Insurance  आणि आरोग्य विमा - Health Insurance  असलाच  पाहिजे. विचार करा जर दुर्दैवाने एखाद्याच्या कुटुंबात कर्त्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालाच तर त्या कुटुंबावर काय  संकट कोसळेल? मानसिक आधार तर जाईलच पण आर्थिक आधार पण जाईल, वाढती महागाई त्यात खाणारी २-३ तोंडे, लहान मुले असतील तर त्यांचे संगोपन , त्यांचं शिक्षण, वडीलधारी लोकांचे आजारपण, नंतर मुलांचे लग्न कसं होणार? म्हणून सर्वात आधी प्रत्येकाचा जीवन विमा आणि आरोग्य विमा असणे आजची गरज आहे.

जीवन विमा घेताना नेहमीचा जीवन विमा घेण्यापेक्षा टर्म इंश्युरन्स  घ्यावा  हा एक अतिशय सोपा व साधा प्रकार आहे. यात फिक्स असा वार्षिक कमी  हप्ता भरावा लागतो आणि विमेदाराचा मृत्यू झाला तरच त्याच्या वारसाला विम्याची एकरकमी रक्कम मिळते; ह्यात एक गोष्ट फार महत्वाची ती म्हणजे विमा संरक्षणाचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच मुदतपूर्तीनंतर कोणतीही रक्कम विमेदारास मिळत नाही.  आपलं पहिले लक्ष्य म्हणजे शुद्ध विमा असला  पाहिजे , परताव्याचा  विचार ह्या पायरीवर  करू नका.  विमा  आणि गुंतवणूक यांची  गल्लत करू नका.

जीवन विमा किती रकमेचा असावा ? 
तर साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे दहा पट कव्हर असावा. म्हणजे समजा ३० वर्ष वयाची व्यक्ती चे वार्षिक उत्पन्न ३ लाख आहे तर जीवन विमा ३० लाख चा असावा. त्यासाठी त्याला वार्षिक फक्त ६ हजार चा कायम स्वरूपी प्रीमियम  पडतो. 

जीवन विमा घेताना कमी वयात असताना घेतला गेला पाहिजे जेणे करून वार्षिक  प्रीमियम कमी भरावा लागतो , ज्या कंपनीचा घेताय त्याचा क्‍लेम सेटलमेंट रेशो' जास्ती असेल असाच बघून घ्यावा , दारू किंवा सिगारेट घेत असाल/ नसाल तर खरी माहिती दिली पाहिजे, आणी सर्वात महत्वाचे म्हणजे योजनेसाठी वारसदार(नॉमिनी ) ठरवलेला असला पाहिजे. विमा कितीही घेता येतो. ह्या संदर्भात माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे. 

आरोग्य विमा:
जीवन र्विम्यानंतर आरोग्य विमादेखील महत्वाचा बनत चालला आहे . ह्याचे कारण म्हणजे वाढत चाललेला रुग्णालयातील महागडा  औषधोपचार आणि नवनवीन उद्भवलेले  आजार . त्यामुळे प्रत्येकाचा आरोग्य विमा असणे गरजेचे आहे.  आपला आरोग्य विमा किमान  ४-५ लाखांचा तर असावाच. ह्या मध्ये विमा कंपनी  कुठे कुठे सुविधा देते,  कोणकोणते आजार समाविष्ट करतात, कोणते नाहीत करत, नो क्लेम चा फायदा, महिलांसाठी मॅटर्निटी सुविधा देतायेत कि नाही , आजारा  आधी आणि नंतर किती दिवसाचा खर्च स्वीकारणार, चालू आजाराचे खर्च करणार कि नाही ह्या बाबी तपासून घ्याव्यात. आरोग्य विमा एकट्यासाठी किंवा  कुटुंबासाठी एकत्रित (फ्लोटर प्लॅन ) घेता येतो.

आर्थिक नियोजनाची  दुसरी पायरी  म्हणजे पैसा साठवणूक (Savings ):

लहान  पल्ल्याच्या ध्येयांसाठी म्हणजे घर चालवण्यासाठी दैनंदिन घरखर्च, वाहन व इंधन खर्च, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, पाहुणे आले-गेले त्यांचा खर्च, एखादी सहल , पार्टी , मनोरंजन , कर्ज हप्ते किंवा विम्याचे हप्ते, ह्यासाठी ठराविक शिल्लक रक्कम मिळकतीतून बाजूला काढून साठवून ठेवली पाहिजे.
सेविंग किती करावी ? 
सेविंग करण्यासाठी विशिष्ट असा फॉर्मुला नाही , साधारण कमीत कमी १० टक्के तरी सेविंग असायलाच हवी(फक्त सेविंग, गुंतवणूक नाही ), जास्ती सेविंग करू नये, सेविंग करून उरलेले पैसे गुंतवणुकीत टाकावे.  प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे (हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते) ह्यांच्या मते महिन्याला मिळणाऱ्या मिळकतीमधून सर्वात आधी सेविंग करावे,  सेविंग करून  नंतर उरलेले पैसे खर्चकामासाठी उपयोग करावे. आपण आतापर्यंत उलटे म्हणजे पहिला खर्च मग त्यातून उरले तर सेविंग असं करत आलोय जे कि चुकीचं आहे. 

सेविंग कुठे करावी? 
मासिक ठराविक रक्कम आपण बँकेत किंवा घरी  ठेवावी जेणेकरून कधीही गरजेनुसार काढता/ वापरता  येईल. काही रकमेचे रिकरिंग (RD) चालू करावे त्यातून आपण विम्याचे हप्ते  देऊ शकतो.  ह्या पायरीमध्ये आपण रकमेच्या रिटर्न्स बद्दल विचार करू नये . हि सुद्धा शुद्ध साठवणूक आहे. 

आर्थिक नियोजनाची तिसरी पायरी म्हणजे गुंतवणूक(Investment ) :
 मध्यम किंवा मोठ्या पल्ल्याच्या ध्येयांसाठी जसे घर घेणे , लग्न कार्य करणे , परदेशी सहल , चारचाकी गाडी घेणे , मुलांचे शिक्षण , वृद्धापकाळात पेन्शन ह्या गोष्टीसाठी वेगळी तरतूद असायला हवी.  सेविंग मधून वरील ध्येयं पूर्ण नाही होऊ शकत कारण सेविंग रक्कम मधून मिळणारा परतावा खुपच कमी असतो , महागाई दर वर्षी सरासरी ७% दराने वाढत असतो नुसत्या काही सेविंग ने आपली दीर्घ उद्धीष्ट्ये पूर्ण करणे शक्यच नाही म्हणून मार्केट मध्ये अश्या काही स्कीम्स आहेत ज्या मधून काही ठिकाणी जोखीम वापरून, तर  काही ठिकाणी बिनधास्त आपण गुंतवणूक करू शकतो आणि महागाई वर मात करून जास्ती रिटर्न्स मिळवून आपली ध्येयं पूर्ण  करू शकतो . 

गुंतवणूक कुठे आणि कशी करावी ?
  1.  कमी प्रमाणात बँक मुदत ठेवींचा पर्याय सुद्धा चांगला आहे. ह्यामध्ये रिस्क काहीच नाही परंतु परतावा जास्ती मिळणार नाही. ७ टक्के च्या आसपास सामान्य  रिटर्न्स मिळतील. 
  2.  काही प्रमाणात म्युच्युअल फंडच्या योजनेत गुंतवणूक करावी.  म्युचुअल फंड हे सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूकिचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातील गुंतवणूक ही शेअर बाजारात केली जाते. शेअर बाजार म्हणजे जुगार असं सरसकट मतं मांडणे चुकीचं आहे. खर म्हणजे शेअर बाजार हाच संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. शेअर बाजारात ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करण्यासाठी त्याचे नॉलेज आपल्याकडे नसते म्हणून अशांसाठी तर म्युचुअल फंड आहे . कारण म्युचुअल फंड मधील राशीचे नियोजन , व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचेकडे तज्ञ मंडळी, फंड मॅनेजर असतो, इथे आपल्याला पैसे देण्या व्यतिरिक्त काहीच करायला लागत नाही , तज्ञ् टीम , फंड मॅनेजर शेअर बाजारातील घडामोडींचा  अभ्यास करून आपला पैसा योग्य ठिकाणी लावून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवून देतात. ह्यामध्ये कमी रिस्क मध्यम रिस्क आणि  जास्ती रिस्क अशी सुविधा आहे, SIP द्वारे आपण ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकता, म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP  हा गुंतवणूक पर्याय छोट्या आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय परिणामकारक ठरतो.  विशेष म्हणजे रिटर्न्स चक्रदरवाढ  (कॉमपौंडिंग ) पद्धतीने मिळते,  म्हणून म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही लॉन्ग टर्म म्हणजे १० वर्ष , १५ वर्ष, २०वर्ष  असेल  तर भरपूर फायदा मिळवता येतो.
  3. काही रक्कम आपण निवृत्तीसाठी म्हणून आताच बाजूला काढून ठेऊ शकतो, त्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये तरतूद करून ठेवावी. नियमित केलेल्या २०-२५ वर्षे  गुंतवणुकीमुळे भरपूर असा निधी सहज जमा होऊ शकतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे खातं किमान  १५ वर्षांचं असतं . ह्यामध्ये वार्षिक रु. १.५  लाख बचत करता येते. साधारण  व्याजदर ८.२ टक्के कमी अधिक असते , हे व्याजदर दरवर्षी बदलत असते . कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पोस्टात पीपीएफचे खातं उघडता येतं.
  4.  थोडी गुंतवणूक सोन्यामध्येदेखील करायला हरकत नाही हवी.  गोल्ड फंड मध्ये  जास्त चांगले  पर्याय आहेत. सोने/चांदी यातील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होणार नाही असे पाहावे.
  5.  काही ठरावीक रक्कम नियमीतपणे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवावयास हरकत नाही पण हे करताना आर्थिक सल्लेगार , तज्ञ् ह्यांचे मार्गदर्शन घ्या, शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्या ऐवजी दीर्घ काळासाठी शेअर खरेदी करून निवांत राहा. आतापर्यंत शेअरमार्केट १०० पासून ते २९००० पर्यंत गाठलेली पातळी वरून तुम्ही अंदाज लावू शकता कि बाजार ने किती परतावा दिला आहे.
  6.  फक्त प्राप्तिकर बचती साठी  इन्शुरन्स, PPF  घेऊ नका, आपल्याकडे हेच केले जाते जे चुकीचे आहे.  त्याऐवजी इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम्स’(ELSS) आहेत अशा योजनेमध्ये गुंतवणूक करून कलम 80 सीअंतर्गत प्राप्तिकर वाचविता येतो आणि सोबत चांगला परतावा म्हणजे रिटर्न्स पण मिळतात . साधारण (ऍव्हरेज) 17 टक्के आसपास  इतका घसघशीत परतावा ह्यामध्ये मिळतो . 
  7. आपली सगळी पुंजी एकाच क्षेत्रात गुंतवू नका, त्याचे वर्गीकरण करा.
थोडक्या शब्दात मी  आर्थिक नियोजन ह्या विषयावर काही  मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत.  तर अश्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केले तर कोणत्याही कठीण परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता. पण लक्ष्यात असुद्या असे नियोजन करताना कुटुंबातील सदस्यचे आणि तज्ञ गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
   










Tuesday, June 28, 2016

अतृप्त



मन सारखं कुढत राहतं
तुला  भेटायला बोलवावं,  की नको बोलवावं म्हणून
एकटंच स्वतःशी भांडत राहतं

कधी कधी विचार येतो
तुलापण मला भेटावं,  असं वाटत  असेल का?
प्रेम नाही पण तीच ओढ
अजून तुझ्यात  शिल्लक राहिली असेल का?

ह्या शापित  आयुष्याचा गळा घोटावा,
असे वाटत असून ही मी आयुष्याचा तमाशा  बघत आहे,
कारण एकदा तरी  तू "इथं " भेटशील ,
माझ्याशी आपुलकीनं बोलशील,
मला माफ करशील  अशी आजही आशा आहे.

पण वेडे, जास्ती वेळ  लावू नको,
एकेकाळी तुज्यावर अधिराज्य गाजवणारा मी,
आता  तुझी वाट पाहून
पाहून थकलोय,
एवढ्या वर्ष्याने आता तुझा चेहराही मी विसरलोय,

हे शेवटचं बोलवणं समज ,
जर वाटलेच भेटावे तर,
पूवीच्या आपल्या भेटायच्या ठिकाणी नक्की ये,
मी तिथेच तुझी वाट पाहत,
गुलमोहरच्या झाडाखाली बसलेला दिसेन,

मग मला,
शेवटचा स्पर्श कर आणि
हळूच मिठीत घे. 
डोळे बंद होण्याआधी तू  आली आहेस,    
एवढी आठवण करून दे.

मग बघ, मी म्हणाल्या प्रमाणे
तुझी माझी ती शेवटचीच भेट असेल,
तुझ्या सोबत असून ही, तेव्हा मी तुझ्या सोबत नसेल.
 
तू आज ये, उद्या ये, वर्ष्याने ये, सात जन्माने ये 
मी इथेच तुला भेटेन,
नाही आलीस तर, जीव मात्र तसाच तेवत ठेवेन
 
आयुष्यभर झालेल्या कोंडमार्यावर
 शेवटची  फुंकर मारून  जा,
नाही म्हणू नकोस ,
शेवटी सोबत 'आपल्या' आठवणी देऊन जा.



  

Saturday, June 18, 2016

पाऊस पाणी‬ (चंकोबा)



आमच्याकडे पाऊस वेळेत पडेना किंव्हा दुष्काळ सदृश परस्थिती झाली कि वरूणदेवाला प्रसन्न करायचे विविध प्रकार होतात. पाऊस-पाणी मागणे(काही लोक चंकोबा म्हणतात ह्याला ), गाढवच लग्न लावणे, जो पर्यंत पाउस पडत नाही तो पर्यंत महादेवाला मंदिरात पाण्यात बुडऊन ठेवणे असे बरेच प्रकार सुरु असतात. परंपरागत लोकांच्या समजुती होत्या, आजही बर्याच खेड्यात किव्हा गावी असे प्रकार सर्हास चालतात. 

आम्ही लहान होतो तेव्हा ह्यातला असाच एक प्रकार खूप प्रसिद्ध होता तो म्हणजे पाऊस-पाणी मागणे म्हणजे चंकोबा करणे. रात्री ८ नंतर मोठी बुजुर्ग लोक  १०-१२ वयोगटातील मुलांना एकत्र करून त्यातला एकाला संपूर्ण नग्न करून डोक्यावर एक पाट द्यायचे, त्यावर एक खोटा चिखलाचा वरूणदेव बनवायचे , मग आम्ही सर्व त्या मुलाला घेऊन प्रत्येकाच्या दारात जाऊन ,

"पाऊस पाणी, आबाळ दानी, आभाळ भरलयं पाण्यानं, कणगी भरल्या दाण्यानं" 

असे म्हणायचो , मग घरातल्या बायका तांब्याभर पाणी आणि नैवेद्य म्हणून भाकरी भाजी आणायच्या, पाणी पायावर घालायचा आणि नैवेद्य आम्हाला द्यायच्या, आम्ही तो पिशवी मध्ये भरायचो. अस करत आम्ही सगळी गल्लीभर पाऊस पाणी मागत फिरायचो. सगळं फिरून झालं की शेवटी एका ठिकाणी मोठ्या अंगणात एकत्र जमायचो , पिशवीत जमलेला नैवेद्य वरूणदेवाला दाखऊन, उरलेला सर्व आम्ही तो अंगणात बसून खायचो.
 
नंतर नंतर मुले लाजायला लागलीत , म्हणून मग जेवायचे ताट तोंडासमोर पकडून(कोण आहे ते कळू नये म्हणून ) पाऊस पाणी मागायला लागले, नेहमी सारखे घरातल्या बायका तांब्याभर पाणी आणि नैवेद्य म्हणून भाकरी भाजी आणायच्या, तांब्याभर पाण्याने त्या पोराला आंघोळ घालायचे, पाणी पडत असताना तो पोरगा गोल गोल फिरणार आणि बाकी चे जोर जोरात,
 
"पाऊस पाणी, आबाळ दानी, आभाळ भरलयं पाण्यानं, कणगी भरल्या दाण्यानं"  असे ओरडणार . 

आमचे बुजुर्ग, गावातले लोक सांगतात कि एक वर्षी असाच दुष्काळ पडलेला, लोकांचे खूप हाल झाले होते तेव्हा एका बाई ने पाऊस पाणी मागितले होते, त्यासाठी गावची लाईट बंद केली होती , त्या वर्षी पाउस चांगला पडला होता म्हणे !! अर्थातच ह्या लहानपणी ऐकीव गोष्टी होत्या पण पावसा प्रति  त्यांची ह्या प्रथेवर किती श्रद्धा होती हे कळते.

आत्ता असे पाऊस पाणी मागायचे प्रकार कमी झालेत पण अजूनही बर्याच ठिकाणी पाऊस पडावा म्हणून असले नाना तर्हेचे प्रकार आजही सुरूच आहे. दोन दिवसा पूर्वी अशी घटना कर्नाटक मध्ये घडली त्याचा किती बाऊ केला गेला , आताच्या लोकांना हे अमानुष, मागासलेले वाटते. ह्यावर ब्रेकिंग न्यूज बनते, अश्या प्रथांना नावं ठेवली जातात. आता मी ह्या गोष्टीचे समर्थन नाही करत की हे किती योग्य आहे आणि अयोग्य आहे ते. काळानुसार काही प्रथा नक्कीच बदलायला हव्यात. पण ह्या प्रथा आपल्याच होत्या आणि अश्या समजुती जायला अजून वेळ लागणार आहे.

Saturday, April 30, 2016

प्रेमाचा experiment





माझ्या range मध्ये बरीच channel होती,
matching frequency ला dish नेहमीच झुलत होती ,
मनाचा receiver एवढा powerful असायचा,
की range च्या बाहेरच्या पण   frequency catch करायचा. 

त्यातल्या त्यात एखादी बरी बघून 
channel auto  tune करायचो ,
महिना दोन महिन्याच्या delay नंतर input मिळायचं,
एकदा input मिळालं रे मिळालं की ,
माझ प्रेम infinity च्या gain नं  amplified  व्हायचं. 

अर्थात अश्या  amplified प्रेमात
 external noise खूप येणार ,
high pass, low pass filter  मारून मारून,
मी तो nullified करणार ,
परत  noise  येणार, परत मी filter करणार,
असा प्रेमाचा experiment बद्दल माझ नेमीच असायचं ,
पण अपेक्षित output मला कधीच नाही यायचं.

जेव्हा लोक  माझ्या experiment बद्दल विचारायचे,
तेव्हा मात्र मी त्यांना manipulated output  द्यायचो,
कारण इथं माझाच output येत नसायचे
आणि  ते demultiplexer Circuit घेऊन फिरायचे . 

  काही केल्या experimentoutput टचं नाही यायचं,
आता  nobel चुकेल कि काय असंचं सारखं वाटायचं,
जवळच्या मित्रांना experiment बद्दल सांगायचो 
तेव्हा मित्र बोलायचे

नेहमी प्रमाण तुझ output
 चुकीच आलय,
कारण सवयी  प्रमाणे तू  आताही,
चुकीच input select केलय. 

माझा experiment तिथेच थांबायचा,
 परत माझा dish matching frequency search करायचा.

                                                                    ........... नितीन माळी   





Saturday, April 9, 2016

तिची कॅन्टीन वरची पहिली भेट.








                         कृतिका आणि मी म्हणजे 'दो जिस्म एक जान' असं म्हंटल तर वावग ठरणार नाही , आहेच आम्ही असे, एकमेकांचे सोलमेट म्हणतात ना! तसंच काहीसं, एकमेकांच्या मनाचे आरसे. कृतिका हॉस्टेल ला राहायला गेल्यापासून मला एक एक दिवस म्हणजे कित्येक वर्ष वाटतंय, आता भेटणं शक्य नसल्यामुळं आम्ही फक्त फोन वरच  कनेक्टेड असतो, माहीती नाही आम्हाला, वायरलेस असलेल्या टेक्नॉलॉजि ने कस घट्ट बांधून ठेवलं आहे. मला हे अंतर नकोच वाटतेय, माझी समजूत काढायला ती वेडी म्हणते डिस्टन्स रिलेशन मध्येपण एक वेगळीच मज्जा असते. ती पण अनुभव एकदा. 

ती मला एरवी भेटल्यावर कार्तिक इकडे चल, कार्तिक तिकडे चल, कार्तिक हे खाऊ, ते खाऊ, ह्याला भेटू ,त्याला भेटू अस तीच सतत चालूच असायचं,  मी पण कधी तिला कधी नाही म्हणालो नाही, मला तिचा हट्ट पुरवायला मज्जा येते. साला!, मुलींचा जन्मच हट्ट करण्यासाठी असतो अन आपला तो पूर्ण करण्यासाठी, त्या हट्टा पेक्ष्या त्यांची लाडीगुडी, तो निरागस भोळा चेहरा, खोटा खोटा राग हे अनुभवणे हि पण एक मज्जाच असते. 

हल्ली आम्ही फोनवरच बोलतो. ती म्हणते तस, ह्यात पण एक वेगळीच गम्मत आहे. कृतिका कित्ती कित्ती बोलते म्हणून सांगू? मी तर तिचेच ऐकण्यात मश्गुल असतो. ती बोलतच जाते , मी ऐकतच राहतो , कधी कधी वाटतं, माझ पिल्लू उगाच हॉस्टेलला गेलं, तिच्यापासून दूर असतो म्हणून फोनवर तासन तास तिची चिव चिव ऐकायला मी अक्षरशः व्याकुळ असतो, दिवसभरात काय काय घडलं  इथं पासून ते माझी आठवण कधी , किती वेळा ,कशी कशी आली, इथं पर्यंत मला ती सर्व सांगत असते.

आज प्रवास करताना सगळा भूतकाळ डोळ्यासमोर येतोय, तिच्या पहिल्या भेटीपासूनचा तो आजपर्यंत चा सर्व क्षण. मी ठरवलं आहे, तिला काहीही करून भेटायचं, आणि एक अनपेक्षित, सुखद धक्का तिला द्यायचा. तिच्या ओढीनं मी ६०० किलोमिटरचा प्रवास करत करत तिच्या अनोळखी शहरात आलोय. तिच्या मैत्रिणींच्या मदतीने. तिला मोगरा खूप आवडतो , म्हणून डब्बा भरून स्टेशन वरून मोगरा आणला आहे. 

मी तिला पाहायला, भेटला खूप  उतावीळ होतोय, किती तर वेळ आता मी कॅन्टीन ला बसून आहे , तिच्या मैत्रिणीच आणि माझ ठरल्या प्रमाणे, त्या कृतिकाला कॅन्टीन ला घेऊन येणार  होत्या. 'तुला एक गम्मत दाखवायची आहे' ! असं म्हणत तिच्या मैत्रिणीनि  तिला डोळ्यावर पट्टी बांधून होस्टेल मधून तिला घेऊन येत होत्या,  कृतिका विचारून विचारून हतबल झाली , काय आहे गम्मत ? काही आगाऊपणा नाही ना? अजून किती वेळ असं? मैत्रिणीनी तिला दोन्ही हाताला धरून कॅन्टीन पर्यंत असच काहीतर बाता मारत घेऊन आल्या. आजू बाजूचे सर्व लोक हा काय प्रकार आहे म्हनून पाहत होते. 

ती समोर आली , तिला इतक्या दिवसाने पासून मला दोन मिनटे अस वाटलं कि 'पटकन पुढे जावे आणि डोळ्यावरची पट्टी काढावी आणि सांगावे कि बघ, कोन आलोय तुला भेटायला' . तिच्या मैत्रिणी जवळ आल्या, सगळ्या गमतीने हसत होत्या, त्यांनी कृतिकाचा धरलेला हात सोडला. मी लगेच पुढे झालो आणि डब्यातील मोगरा तिच्या नाकापर्यंत नेला. तिने दीर्घ श्वास रोखून त्याचा गंध घेतला आणि त्याच क्षणाला तिने डोळ्यावरची पट्टी बाजूला केली. 
जशी तिने डोळ्यावरची पट्टी बाजूला केली तशी तीने मला पाहून जोरात एकच किंचाळी ठोकली. त्यात तिच्या मैत्रिनींनी पण हातभार लावला. दोन्ही हात गालावर लावत, आश्चर्याने ती मला बघतच राहिली. तीच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले होते, तिला काय बोलायचे सुचत नव्हते, आजूबाजूचे सर्व विसरून दोन पाऊले पुढे आली आणि माझ्या मिठीत येवून फुंदुन फुंदुन रडू लागली. एका हातात डब्बा पकडून दुसर्या हाताने मी तिला कवेत घेतले, आणि तिला शांत करू लागलो. 

ती माझ्या मिठीत व्यक्त तर होऊ शकत होती पण माझे तस नव्हत. मी मात्र,  "ये वेडे, असं काय करतेस, बोल माझ्याशी" अस म्हणत,  तिची पाठ थोपटत राहिलो, अन  तिची मिठी मात्र प्रत्येक हुंधक्या सोबत तेवढीच आवळत गेली. 


('तिची कॅन्टीन वरची पहिली भेट' ह्या काल्पनिक कथा संग्रहातून :P )

                                                                                                                               नितीन म माळी. 




Saturday, April 2, 2016

पाऊस पडून गेल्यावर

पाऊस पडून गेल्यावर 




पाऊस पडून गेल्यावर,
लक्षात राहते, ती चिंब भिजलेली माती,
कितीही नाही म्हणले तरी,
ओलावते मनातील गोठवलेली नाती,

पाऊस पडून गेल्यावर, 
थंडगार बोचरी हवा अंगात शिरू पाहते,
कितीही नाही म्हणले तरी,
कुठल्यातरी आठवणींशी, एकटीच खेळू पाहते. 

पाऊस पडून गेल्यावर, 
खिडकीतून बाहेर बघत, एकटाच उभा राहतो,
 भिजलेले पक्षी, झाडे, घरे बघून,
आतल्या आत मी हि, भिजून जातो. 

पाऊस पडून गेल्यावर, सगळ कसं बहरून येतं,
मग,
 मन स्वतालाच ओढत, घराबाहेर घेऊन जातं,

रंगबेरंगी फुलपाखरे, झरझरणार पाणी, 
मातीचा सुगंध, पक्ष्यांची मधुर गाणी,
असं सगळं बघून, मन गायला लागतं, 
मधेच, गवती चहाची तल्लब होते,
आणि सोबत, गरम भजी मागायला लागत. 

पाऊस पडून गेल्यावर,  
सगळेच हळूहळू बाहेर पडतात ,
माझ्यासारखेच इतर हि चार लोक,
 टपरीवर जमायला लागतात. 

दरवर्षी मृगाचा घनं, असाच गोंधळ घालतो,
मागील वर्षी घालवलेले क्षण, 
पुन्हा तसाच, सोबत घेऊन येतो,

पुन्हा त्याच आठवणीच डबक, परत भरून येतं ,
आणि, मन पुढच्या पाउसाची, 
 परत वाट बघायला लावत. 

                                     …… नितीन माळी








Friday, April 1, 2016

येडं मन

येडं मन. . . 

काय माहिती येडं मन, कसं भूलायला लागलं,
तुझ्या ओढीनं,  पुरतं झुरायला लागलं,
फुल पाखरागत, उडाला लागलं,
रान माळात, हिंडायला लागलं.

दररोज, थोडं थोडं फुलायला लागलं,
तुझचं गुणगान, गायला लागलं,
थोडं थोडं क्रांतिकारी, व्हायला लागलं.  
बाकी जग सारं, विसरायला लागलं,

तुझं मन, ह्याला झुलवायला लागलं,
दीड-दमडीच ते , भाव खायला लागलं,
इतक्या दिवसाची ओळख, विसरायला लागलं,
माझ्या पुढ तू कोण?,असं विचारू लागलं.

एवढ झाल्यावर हे मन , तंतनायला लागलं,
येता जाता उगाच, भडकायला लागलं,
बंद खोलीत कोंढून, रडायला लागलं,
अंधारात एकटच, कुढायला लागलं.

दिस असचं, सरू लागलं,
मन हळू हळू, घट्ट व्हायला लागलं,
स्वतःच, कसं तरी सावरायला लागलं,
जरा जरा माणसात यायला लागलं.

स्वतःला जेव्हा ओळखू लागलं,
स्वतःसाठी थोडं जगायला लागलं,
तेव्हा पासून खरं ते , उमलायला लागलं, फुलू लागलं,
बागडू लागलं, बोलू लागलं,
आनंदाने नाचू हि लागलं. 
 .

येडं मन.....कुठलं. . . 
                                         . . . नितीन माळी

Wednesday, March 2, 2016

वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो


थोडासा धीर धर आधी कामाचं बघतो 
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो 

लोक म्हणत्यात यंदा दुष्काळ जोराचा आलायं , 
नेहमी प्रमाणे ह्या वर्षी पण  पाउस गायब झालायं, 
हालक्या सरीतच धान्य पेरून घ्यावं म्हणतोय ,
कामाच्या सवडीतून जमेल तसे तुझाकडे लक्ष घ्यावं म्हणतोय ,
थोडासा धीर धर आधी कामाचं बघतो, 
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो,

 फक्त अर्धच  शेत हिरवं पिवळ झालंय ,
पाण्याविना अर्ध, केव्हाच मरून गेलयं ,
पाटलाकड जाऊन थोडं उसनं पैसे आणावं म्हणतोय,
अर्धच  का असना तेवढं तरी फवारून घ्यावं म्हणतोय ,
एवढ फक्त काम होउदे
हाती चार पैसे येउदे
थोडासा धीर धर आधी पैश्याचे बघतो 
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो

शेतामध्ये माल यंदा कमीच झालाय  ,
उसनं आणि ब्यांक कर्ज चा फास  गळ्याला आलंय, 
आता कुठ काय आधार मिळतोय का बघावा म्हणतोय 
सरकारी ऑफिस ला जरा जाऊन याव म्हणतोय
आज जरा मी घाईत आहे,
सगळ लक्ष्य फायलीत आहे 
थोडासा धीर धर आधी कर्जाचे बघतो,
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो

मायबाप सरकारन १५०० रुपये अनुदान दिलंय 
म्हणालं तसं  तुझ कमीच नुकसान झालंय
काही  का असंना चार पैसे लागल्यात हाताला
तेवढ तरी मागायचे कुठ आणि कोणाला

आता थोड तालुक्याला जाऊन येतो ,
 आधी पोरग्याला शाळेची पिशवी अन म्हातारीच औषध आणतो 
येताना तुला गजरा नक्की आनेण

अजून थोडासा धीर धर
आधी त्याचं  बघतो 
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो. 

………  नितीन माळी 



Wednesday, February 10, 2016

माझ्यातला "मी"


माझ्यातला  "मी"
आज तुझ्या आठवणींनी पहाड उभा केला,
क्षणात एका, आसवांच्या सागराने, त्याला त्यात बुडवला    

लगेचच आशेच्या स्वप्नांनी, एक होडी तयार केली
बघता बघता भुर्रकन, ती चार वर्ष मागे गेली    

छान छान आठवणींचे टप्पे, मी सहज पार केले,
काही टप्याने तर मला, अगदीच गार केले    

आता माझी होडी , थोडी संथ झाली होती,
सुखाचा डोह पार करून, वेगळीकडेच भरकटली होती    

अश्यातच गैरसमजुतीच्या वादळाने मला,
 भर समुद्रात गाठले, 
थोड्या वेळचे बे-मोसमी ढग बरसत असतील
असे मला वाटले

एकट्याने मी त्या वादळाशी दोन हात केले,
ते वादळ गेले आणि दुसरेच वादळ आले

अशी कित्येक वादळे पेलत पेलत 
मी समुद्र पार केला 
कदाचित त्या वादळांनीच,
मला समुद्रा बाहेर यायला आधार दिला

आता समुद्र पण संपला होता
आणि
पहाड पण दिसत नव्हता
कारण आता माझ्यातल "तुला" शोधण संपल होत
आणि 
माझ्यातल्या "मी" चा नवीन प्रवास सुरु झाला होता .
………. नितीन माळी


Sunday, February 7, 2016

गणेश फार्म , राजापूर


     
   


                       अगं ये, ऐक ना, "दुपारी तीन नंतर राजापूरला, आज जाऊन येयीन, ते आपल्या धनकवडी पासून थोड्या अंतरावर आहे, एकाने पशुपालनाचा मोठा व्यवसाय केलाय म्हणे, पंधरा एक…म्हैशी आहेत अस ऐकले आहे, जरा जाऊन बघून येऊ म्हणतोय एकदा, कस काय आहे ते, माहिती काय देतोय का बघून येतो म्हणतोय" मी दात साफ करत करत बायकोच्या कानावर आजचा बेत टाकला आणि अंघोळीला गेलो.

"हं", ती एवढेच बोलून तिच्या कामाला लागली.

अंघोळ झाल्यावर चहाची वाट बघत बघत पोरांच्या खोलीत डोकावून पाहिलं, पोर उशिरा पर्यंतं झोपली होती.
"ओ राजेश खन्ना, अमिताभ बच्चन उठा आता, अजून किती वेळ झोपणार? आईने चहा केलाय, उठा उठा लवकर" मी आवाज दिला, पण पोरं एका आवाजात उठतील तर ती पोर कसली? मग मी चहा घ्यायला निघून गेलो.

चहासोबत बायकोने "हे आणायचे आहे उद्या लागेल" असे म्हणत किरण मालाची चिठ्ठी पुढे केली, मी न वाचताच ती घडी घालून पाकिटात ठेवली आणि शेतात कामाला लागलो.

ठरल्या प्रमाणे तीन नंतर मी आवरले, आणि गाडीला किक मारून राजापूर च्या दिशेने निघालो.

जाताना पुढे रस्तात गावातल्याच एका किराणा दुकानात बाजाराची चिठ्ठी दिली, "हा माल भरून ठेव मी घरी जाताना घेऊन जाईन", एवढे सांगून मी राजापूर च्या दिशेने निघालो. तास भरात म्हैशी बघून, थोडी माहिती घेऊन निघायचे ह्या विचाराने जाता जाता डोक्यात प्रश्न गोळा करत मी धनकवडी पार करून तासात राजापूरची वेस पार करून पोहोचलो एकदाशी राजापूरला.


संबंधीत माणसाचे नाव पत्ता माहित नव्हते, ते विचारायला गावात एका चहाच्या टपरी जवळ जाऊन मी त्या बद्दल विचारपूस केली,

"तो गण्या का "? चहा वाल्याने मला विचारले!

"मला नाव माहित नाही पण पंधरा बर म्हैशी पालन करणारा राजापूरचा कोण तर आहे बघा".

"तो गाण्याच!, गावात त्यानेच एवढ्या म्हशी पाळल्या हायत्या" !

"इतुन मोठ्या रसत्याला वळा, थोडंसं पुढ गेला कि आतल्या आंगाला गणेश फार्म चा पिवळा बोर्ड हाय बघा! , मोठा हाय बोर्ड, दिसलच बघा!

बर! बर! म्हणत मी गणेश फार्म चा पिवळा बोर्ड शोधत शोधत फार्म वर पोहचलो. समोरच दोन कुत्यानी जोर जोरात भुंकत माझे स्वागत केलं.

"हां गप्पं , चल ये "हाऱ्या ", "नाऱ्या " चल य बघू माघारी ", असा आवाज आला.

" कोण पायजे"? एक सडपातळ चाळीशीतला पुरुष त्या कुत्र्या ना बाजूला घेत मला विचारले.
मी वडगावचा, नारायण तोडकर, फार्म बघायला आलो आहे. मालक तुम्हीच का?
न्हाय, न्हाय मालक हाईत आत म्हंदी, चला म्होर आलोचं.

समोरच मोठा वाडा होता, जुनं लाकडी बांधकाम होत.
वाड्याच्या बाहेरूनच मी आवाज दिला "कोण आहे का" ?
"आलो आलो " म्हणत कोणितर दरवाजा उघडतं आवाज दिला ,
तोच बाहेर आल्यावर बघतो तर काय?
माझा बालमित्र गणेश !!

"आरे गणेश तु"? मी आश्चर्याने विचारले,
"कोण नारायण तोडकर का "?
हो!
आयला, तू नाऱ्या ओळ्खलां न्हाइस,
य, य, आत ये, गण्यां बोलत बोलत मला वाड्यात आत घेऊन आला,

वाड्याच्या सुरुवातीलाच बैठक व्यवस्था होती, "लै दिसांन भेटलास गड्या" असे म्हणत गण्याने बसायला जागा केली, थांब आलोच असं मला म्हणत, बायकोला आवाज देत आतल्या खोलीत गेला,
मी वाड्यात इकडे तिकडे पाहत बसलो, माझी नजर भिंतीवर गेली. फेट्यात, काळ्या टोपीत एका म्हातार्या माणसाचे हार घातलेले अनोळखी फोटो लटकवले होते, तेवड्यात गण्या पाण्याचा तांब्या घेऊन आला,

"लै दिसानं आलास गड्या, वळखनास बी आता", पाण्याचा तांब्या पुढ करत गण्या बोलला ,
एक प्रकारचा आश्चार्यीत आनंद गण्याच्या चेहर्यावर दिसत होता.

"होय, खूप दिवसाने भेटतोय आपण, पण मला माहित नव्हते तूच आहेस म्हणून"!
म्हंजे?
अरे राजापूर ला कोणीतरी मोठा म्हैशी पालन व्यवसाय करतेय असे ऐकले होते, मला पण थोडे माहिती करायची होती म्हणून विचारात विचारात आलो.

कुठं अस्तूस हाल्ली? जत्रेत एकदा घावलास त्यावर आता, वडगावलाच अस्तु का? गण्यान विचारलं
"हो हल्ली वडगावलाच असतो" मी उत्तर दिलं

(तेवढ्यात गण्याची बायको चहा घेऊन येते)

गण्या बायको कडे बघत, ह्यो बघ… , माझ्या शाळेतला नारायण, वडगावचा
मी "नमस्कार" !
गाण्याची बायको (नुसताच हात जोडून ), एकटच आलाय व्हय? आणि मंडळी?
"होय, काम होते म्हणून एकटाच आलोय", एवढे ऐकून गाण्याची बायको आत गेली.

"राक्या, रम्या, विष्णू, जाधवाचा विज्या भेटत्यात का"? गण्या ने जुन्या मित्रांची विचारपूस केली
"नाही, कोणालाच भेटलो नाही"
"तू मुंबई ला अस्तूस असं संत्या निकम म्हणाला व्हता",

"सहा महिन्या पूर्वीच आलो सर्व सोडून एकदाची आपल्या गावी",
आता गावातच राहणार आहे, दुसरीकडे काम करायची इच्छा नाही, स्वतःच काय तर करायचे म्हणतोय म्हणून तुझा म्हीशीपालन बघायला आलोय.

लै भारी गड्या, नोकरीत काय बी नाय बग, चल तुला मळा, म्हशी, बाग दाखवतो,

"हो चल तेच पाहायला आलो आहे",
असे म्हणत आम्ही दोघेही वाड्या बाहेर पडलो, आता माझा मला थोडा आधार वाटू लागला, मनात कुठलीच परकी भावना उरली नव्हती,आता बिनधास्त खूप काही विचारू शकतो असे वाटू लागले आणि हे फक्त गण्या माझा पहिल्यापासूनचा मित्र होता म्हणून.

पाच वाजले होते , गप्पा मारत मारत आम्ही मळ्यात पोहचलो, आधी गण्याने मळा फिरवून दाखवला, ऊस, केळीच्या बागा, कांदा, मेथी, वांगी चे प्लॉट पहिले, हे सर्व पाहताना गण्या त्याच्या लागवड खर्चा पासून ते बाजार भावा पर्यंत सर्व आकडे मला सांगत होता, मलाही त्याचे कौतुक वाटत होते, नंतर आम्ही म्हैशीचा गोठा पहिला, मुऱ्हा दिल्ली जातीच्या वीस म्हैशी होत्या दावणीला, मोठ्या, काळ्याकुट्ट रंगाच्या, धिप्पाड अश्या सर्वच होत्या, त्यांची व्यवस्था पण कमालीची होती, प्रशस्त दावन, मोठा शेड, दोन कामगार चोवीस तास देखणीला, वैराणीची व्यवस्था, शेण मूत्र चे पण पद्धतशीर व्यवस्थापन शेतातच गोबरगॅस प्लांट बसवला होता त्याचा डोलारा मी पाहतच बसलो, कमी शिक्षण घेतलेल्या गन्याचे कर्तृत्व मला माझ्या पेक्ष्या खूपच मोठे वाटत होते.

"गण्या खूपच मोठा व्याप आहे लेका तुझा, कसे मॅनेज करतो हे सर्व,

किती खर्च केलास, कस काय जमलं तुला हे सगळे? मी त्याला विचारू लागलो, कारण माझ्यासमोर आर्थिक जुळवा जुळव हाच एक मोठा प्रश्न होता.

"आर त्य सम्द तुला सांगतो निवांत बसून, चल वाड्यावर आधी",

मी घड्याळ पहिले, जवळ जवळ सात वाजत आले होते, मी लवकर जायची घाई केली हे गाण्याला कळाल, त्याने आज रात्री मुकाम करण्याचा गळ घातला.

"नाऱ्या , लेका लई दिसान आलायस, आज कोंबड कापतो, ऱ्हां कि गड्या, वैनीला फोन लाव सांग उद्या एतो ".
त्याच्या आग्रहाला मी नाही नाही म्हणत शेवटी राजी झालो आणि घरी निरोप देऊन मी तिचेच राहीलो .

रात्री गाण्यान वाड्याबाहेर झाडाखाली "दारू आणि कोंबड्याची" जुळणी केली होती.
गार वाऱ्यात, जुन्या गोष्टी बोलता बोलता आम्ही प्यायला बसलो , आमचे दोन पेग कधी झाले कळलच नाही.

दुसर्याच पेगलाच मी हालू लागलो,
दारू पोटात गेली, डोकं झिंगवायला लागली, जीभ अडखळत अडखळत थोडी वैयक्तीक होऊ लागली ,

"गन्या , मुंबई ला सहा वर्ष नोकरी करून मी अक्षरश्या वैतागलो होतो रे , कमी पगार, फिक्स काम नाही, भाड्याची खोली, दोन मुले. कसंतरी भागायचं आमच. गावच सगळे सोडून आई बाबा मुंबई ला येणार नाही म्हणाले, आमच्या विना काहीच अडले नाही त्यांचे, पण मनात राहून गेलं… जीवाची मुंबई करत करत जिवाभावाची माणस सुटली, अक्षरशा नको झाली होती ती मुंबई. "जीवाच्या मुंबई" मध्ये आता पहिल्यासारखा "जीव" लागेना म्हणून सहा महिन्या पूर्वीच आलो सर्व सोडून एकदाची आपल्या गावी. आता शेती, व्यवसाय करायचा म्हणतो, तुझ्या सारखा!!

तू देरिंगबाज गड्या, कस केलस, कस जमावलंस?


गण्याचा तीसरा पेग चालू होता, गण्याला पण आता थोडी झिंग येऊ लागली होती ,

"कस्ल काय घिऊन बसलास ! , काम केलं तर होतंय कि समद "

" पण डेरिंगबाज तर हुतोच पैंल्या पसनं",

गण्या थोडा भूतकाळात गेला, कदाचित दारू तीच काम करत होती.

"आठवीत व्होतो तेव्हाच संगी च येडं लावलं हुत, त्याच नादात पार खुळा झालो व्होतो, शाळंमाग एकदा तिचा हात धरला हुता, गावबर बोंबल्ली हुती ती ,

माझ्या बा नं पडुस्तर मारला मला, पण संगीचा नाद न्हाय सूटला!

म्होरं अकरावीला गेल्यावर बा ला वाटल सुधारलो पण कस्ल काय"!!
अस म्हणत गण्याने चौथा पेग लावला तोंडाला!

"कॉलेजात पण ती सोबतच आली, येता जाता मला नखरं दाऊ लागली, बोलायची आदून मदुन ती , मग तर म्या लैच ....
ग्लास मधला घोट पित पुढचं शब्द राहून गेलं.

तुला म्हणून सांगतूं एकदा संगीच्या घरा जवळच्या उसात तिला वडली, त्य हणम्यान पाहिलं, गावबर तमाश्या झाला र !!! संगीला आणि मला लै हाणला माझ्या अन तिच्या बा न.

संगीच तिच्या बा न लांब लगीन लाऊन दिलं. माझ कॉलेज सुटल , घरात दोन म्हशीची चार झाली, मळा, जनावरे हेच आलं नशीबी, नायतर संगीला घिउन मी पण मुंबई ला असतो बग ….

गण्याला संगी न मिळण्याचे दुखः आजपण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत. मी जाऊदे गण्या होत असं म्हणत त्याची समजूत काढली.

म्होरं आमच्या बा न त्याच्या मैतर ला म्या जावाय म्हणून करून घी म्हणून लई गळ घातली, त्यान पण मोठ्या मनान माझ त्याच्या एकुंती एकं पोरी सोबत लगीन लाऊन दिलं,

"सासरा मेल्यावर इकडचं अन तिकडच म्याच सांभाळलं, चार म्हशी ची वीस केली, बाग लावली, जमीन वाढवली, गावात कुणाकड पण नाय एवढ कमावतोय बग "

" होय खरं आहे बघ ! मी म्हणालो.

"तू पण कमीवशील रं ! म्या हाय मदतीला, काम करायची तयारी ठेव, म्होरंचं म्होरं बघू" !! गण्यान मला धीर देत देत शेवटचा ग्लास भरला, आणि मी होय होय म्हणत ग्लास रिकामा केला.

त्याच्या एवढ्या वाक्याने माझ्या खचलेल्या मनाला आता थोडा धीर आला होता, कित्येक दिवसाने जीवाभावाच कोण तरी आहे, असे भासत होत आणि काम करायची उर्जापण मिळाली असे वाटत होतं.

दोघांनी पण प्यायचं संपवून भाकरी आणि देशी कोंबडीवर ताव मारला, आणि झाडाखाली बाजल्यावर, गार वाऱ्यात शरीराला विचारमुक्त करून एका चीर शांतीच्या निद्रेत झोकून दिलं !!!!
                                                                                                    ……… नितीन माळी 

 

Thursday, January 21, 2016

बुरसटलेली बुद्धिजीवी

बुरसटलेली बुद्धिजीवी 


आपले आस्तित्व टिकवण्यासाठी माणसाने बराच संघर्ष केला, वेग वेगळे शोध लावले, माणसाने बरीच प्रगति केली, कित्येक प्रतिकूल परिस्थितिवर मात करून तो २१व्या शतकामध्ये  आला आहे. एव्हाना आत्ता तो खूपच प्रगत आहे , सर्वच गोष्टीने,
पण खरच तो एवढा बुद्धिवान झाला आहे का? एवढे सर्व सुख सोयी मिळवून सुद्धा तो सुखी आहे का? पूर्वीचा माणूस आणि आत्ताचा माणूस ह्याच्या मानसीकतेमध्ये  काही बदल झाला आहे का? की तो तसाच आहे जसा आधी होता तसा? 
  
साधारण गेल्या १५-२० वर्ष्यात माणसाच्या जीवनात खूपच बदल झाला. झपाट्याने जग बघता बघता जवळ आले, वैद्यानिक क्रांति झाली, इंटरनेट, सोइल नेटवर्कमुळे लोकांना जग ठेंगने वाटू लागले, त्याचे चांगले परिणाम आणि प्रभाव पण दिसू लागला आणि त्यामुळेच एक गुपित काळी बाजू पण समोर येऊ लागली. मी वाढत्या  विज्ञानाला किव्हा तंत्रज्ञानाला दोष नाही देत, एखादा शोध लावतो तेव्हा काळाची गरज बघून चांगल्या गोष्टीसाठी शोध लावला जातो उदा.- औषधशास्त्र, वैध्यकीयशास्त्र , रसायनशास्त्र, संगणक, आधुनिक हत्यारे  आणि बरेच काही शोध लागले ते समाज्याच्या कल्याणासाठी पण आता त्याचा वापर कश्यासाठी, कसा होतोय हे पण आपल्याला माहिती आहे. एकाला लाभलेलं वरदान हे दुसऱ्यासाठी शाप बनत चालले आहे. मग हे शोध चुकीचे होते का? फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत का? नाही नक्कीच नाही. 

मग, ह्यात चुकी कोणाची? कोणाचा दोष आहे? मी तर असेच म्हणेन कि ह्यात दोष आहे बुरसटलेल्या बुद्धीजीवींचा अर्थात ठराविक माणसांचा, त्यांच्या गंजलेल्या मनाचा, अशी माणसे ज्यांचे सामाजिक कार्य शून्य आहे, अशी माणसे जे समाज्यात आपले अस्तित्व खोट्या गोष्टींच्या आधारावर शोधत बसलेली आहेत. ती हीच माणसे आहेत जी किड्या मुंग्यांसारखी जन्माला येतात आणि  किड्या मुंग्यांसारखी मरून जातात. ह्या अश्या लोकांनी विज्ञानाचा वापर चुकीचा केला. 

अशी माणसे आधी दिसत नव्हती का ?आताच कशी दिसू लागली? असे काही लोक म्हणू शकतात. पण तसे नाही, ह्या आधी हि अशी लोक होती पण इंटरनेट, प्रींटमेडिया, फेसबुक, व्हाट्स -आप मुळे समाज्यात किती विक्षिप्त लोक आहेत ह्याची जाणीव आता होत आहे. पूर्वी अश्या लोकांना साधे भोळे समजत असत आपण, हल्ली फेसबुक प्रोफाईल बघितले तरी समजते माणसाची मनोवृत्ती किती खालच्या तलाची आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हाट्स -आप मुळे माणूस माणसाच्या खरच जवळ आली का हो? 


जागतिक दहशतवादी संघटना  इंटरनेटचा वापर त्यांचे साम्राज्य पसरवण्यासाठी करत आहे, नुसत्या फेसबुक कॉम्मेंट मुळे लोकांचे जीव जाऊ लागले आहेत. जगात सेल्फीच्या आहारी जाऊन आत्तापर्यंत खूप लोक मेले त्यात सर्वाधिक म्हणजे  तब्बल २७ लोक मेले आहेत जे भारतीय होते. मृत देहासोबत जेव्हा सेल्फी पाहण्यात आल्या तेव्हा संवेदनाहीन तो मेलेला मृत धड आहे कि हा फोटो काढणारा असा प्रश्न स्वत्तला पडायला लागला आणि हे तंत्रज्ञानाच्या आती वापरामुळे झाले नाही तर माणसाने बुद्धी गहाण ठेवली म्हणून झाले  … स्टीव जॉब्स, बिल गेट, मार्क झुकरबर्ग ह्यांनी पण तंत्रज्ञानाचा वापर केलाच पण त्यामुळे त्यांचे काही नुकसान नाही झाले, फायदाच झाला आहे. कट्ट्या वरती, कोपऱ्या वरती जाउन मित्रांच्यात रमणारी लोक हल्ली व्हाट्स -आप ग्रुप वर वाद-विवाद करत बसलेली दिसतात. बाथरूम पासून ते बेडरूम पर्यंत सोबतीला हल्ली  मोबाईल असतोच,  महिलांच्या फसवणूकीचा मुद्दा तर नेहमीच  ऐरणीवर असतो.

सोइल नेटवर्क साईटवर प्रत्येकाने आपल्या सोयीचा झेंडा उचलला आहे, प्रत्येकाने आपले आपले रंग वाटून घेतले आहेत आणि ह्यातून वाद विवाद होऊन जे गुन्हे घडत आहेत ते अश्या कोत्या मनाच्या वृत्तीमुळेच नाहीतर ग्रुप मधून काढले म्हणून अडमीन वर चाकू हल्ले झाले नसते.

लोक्कांना विचार करण्याची वेळ आली आहे खरच आपण ह्या सर्व गोष्टीच्या आहारी गेलो आहे का? सवयीचे रुपांतर जेव्हा व्यसना मध्ये होते तेव्हा येणार्या परिणामाला सामोरे जाण्याची पण सवय आताच लावून ठेवलेली बरी, येणारा काळ अजून खूप काही घेऊन येणार आहे.



Monday, January 18, 2016

नविन उद्योग अयशस्वी का होतात?



               
                                           
                 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच  देशातील तरुणांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या महत्त्वाकांशी योजनेचा शुभारंभ केला. त्याचे स्वागत आहे . अशा पद्धतीच्या योजनांची गरज होती
आपल्याला माहित आहे नविन उद्योगाची  (स्वयं रोजगारची ) आजच्या तरुणानां किती गरज आहे, वाढती महागाई, बदलत चाललेले मॉडर्न लाइफ स्टाइल आणि त्याच बरोबर वाढत चाललेली बेरोजगारी ही देशाची त्याच बरोबर प्रत्येक  युवकांची आजची समस्या आहे. आत्तापर्यंत आपण बघत आलो आहे की खुप छोटे - मोठे उद्योग आपल्या अजु बाजूला उभे राहिले पण त्यातले किती यशस्वी झाले? हे जर पाहिले तर खूपच कमी नविन उद्योजक यशस्वी झाले आहेत.

असे का होते ? नविन उद्योग अयशस्वी का होतात, त्यांच्या पुढे नक्की कश्याचा अडथळा येतो ह्यावर आज आपण बोलुयात

कोणताही नविन उद्योग सुरु  करण्याआधी आणि नविन उद्योग सुरु केल्यानंतर ते  अयशस्वी का होतात त्याची कारणे पाहुयात

 प्रमुख कारणे :
  1. व्यवसायची निवड -                                                                                                                                                     व्यवसायची निवड ही सर्वात पहिली पायरी आहे, नविन  व्यवसाय सुरु केल्या नंतर काही काळाने आपल्याला वाटते आपण चुकीच्या क्षेत्रात तर नाही ना आलो? व्यवसाय कुठलाही असो , त्या व्यवसायाची निवड करताना आज बाजारमध्ये कश्याची मागणी आहे (मार्केट ट्रेन्ड काय आहे ) आणि आपल्याला काय जमते (त्या विषया मधे आपले किती knowledge आहे ) हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्या भारतात किव्हा भागात म्हणा हवे तर पाउला-पाउला वरती वेगवेगळी मागणी असते, त्यातून आपल्याला योग्य मागणी लक्ष्यात घेऊन त्या संबंधीत व्यवसाय निवडण्याची गरज असते. मंदिराच्या बाहेर हार-फुल नारळचाच व्यवसाय जास्ती होतो हे कळाले पाहिजे. योग्य गरज ओळखून तसा पुरवठा करने गरजेचे असते.                                                                                                                      
  2.   आर्थिक भांडवल /गुंतवणूक -                                                                                                                                      बऱ्याच वेळा  व्यवसायची निवड होते पण नविन लघू उद्योगाची सुरुवात करायला  मोठा अडथळा असतो तो आर्थिक भांडवलचा म्हणजेच व्यवसाय उभारणीसाठी लागणारा पैसा उभा करणे. ब्यँकांचा सावध पावित्र्या मुळे हे आर्थिक भांडवल सहजरित्या मिळणे थोड़े कठीन होते. ज्यानी नव्याने उद्योग सुरु केलेले आहेत त्यांना वाढती टेक्नोलॉजी , व्यवसायाचा विस्तार ह्या गरजा पूर्ण करण्या साथी निधि लागतोच, निधि अभावी व्यवसाय जास्ती वेळ तग धरु शकत नाही. व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर योग्य वेळी योग्य पैसा गुंतवणे गरजेचे असते. आर्थिक सुनियोजन आणि व्यवस्थापन च्या अभावामुळे  व्यवसायात आपण अयशस्वी होतो.                                                                                                                                                                                          
  3. भीति/जोखिम  -                                                                                                                                                        व्यवसायात उतरण्या आधीपासूनच हा घटक आपल्यामधे ठान मांडतो. भीति ही वेगवेगळी असू शकते उदा. व्यवसायात बुडण्याची भीति (पैसा ) , व्यवसाय अयशस्वी होण्याची भीति, उत्पादन न चालण्याची भीति, व्यवसाय वाढीचे निर्णय चुकण्याची भीति, अशी अनेक प्रकारची भीति असते. काही व्यवसाय मधे कायद्याच्या  भीतिचे सावट नेहमीच असते उदा - डॉक्टर्स, फॉरेंसिक लॅब , ड्रग्स एंड केमिकल होटल्स एंड बार इत्यादि. ह्या भीतीने जे सध्या चालु आहे त्यातच आपण समाधानी आहोत असा समज करून व्यवसाय वृद्धि साठी काहीच न केल्याने आपण बाजारात जास्ती दिवस टिकुन  नाही राहु शकत. व्यवसाय म्हंटले की जोखिम आलीच हे वास्तव आपण विसरून चालणार नाही. म्हणून जोखिम , भीति हा पण एक घटक आहे ज्यामुळे व्यवसायात आपण अयशस्वी होतो.                                                                                                                                                                        
  4.  व्यवसायीक भागीदार आणि टीम -                                                                                                                                एका सर्वे नुसार असे  पाहण्यात आले आहे की भागीदारीमध्ये व्यवसाय हा एकट्याच्या व्यवसायापेक्ष्या चांगला होतो पण तो भागिदार योग्य व्यक्ति असेल तरच. अनेक वेळा व्यवसायीक भागीदारांमधे वाद/कलह , मतभेद होतात परिणामी व्यवसाय अयशस्वी होतो. योग्य  भागीदार मिळाला तर व्यवसायात  लवकर जम बसतो, निधीचा पर्याय प्राप्त होतो पर्यायाने  भाग भांडवल वाढते, नविन युक्त्या, मत, सल्ला सहज मिळु शकतो, नाही तर "हाउसिंग डॉट कॉम" चे  उदाहरण आपण पाहिले आहे. नविन उद्योगांमध्ये व्यावसायिक संघ (Team) चा सुद्धा खुप मोठा सहभाग असतो. काही उद्योगांमध्ये उच्च पदे गरजेचे असतात काही उद्योगांमध्ये तेवढे गरजेचे नसते. टीमची प्रेरणा(motivation), त्यांची निष्ठा(dedication) ह्यावर व्यवसाय यशस्वी- अयशस्वी अवलंबून असते.                                                                                                            
  5. व्यवसाईक प्रशिक्षणाचा अभाव-                                                                                                                                 आधीच आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रक्टिकल ला खुप कमी लेखण्यात आले आहे. ह्या कारणाने जेव्हा व्यवसायामध्ये आपण जातो तेव्हा आपल्याला कळते की आपला पायाच मजबूत नाही. त्या नंतर ही व्यवसायीक प्रशिक्षण किती लोक घेतात? हा ही एक प्रश्न आहे. सर्व गोष्टी आपण आउटसोर्स करू नाही शकत, व्यवसायाच्या सुरुवातीला सर्व धुरा आपल्याला संभाळायला यायला हव्यात , सेल्स, ह्यूमन रिसोर्स , मैनेजमेंट ह्या कला आधिपासूनच यायला हव्यात , पण तसे होत नाही हेही एक कारण आहे ज्यामुळे आपण व्यवसायात अयशस्वी होतो. 
ह्या व्यतिरिक्त अजुन काही मुद्दे आहेत जसे शासकीय योजनेचा उपयोग करून न घेणे , जागतिक घडामोडी अवगत करने   पण वरील मुद्दे जास्ती विचारात घेतले गेले पाहिजे असे मला वाटते. भारत सरकार ने काही मुद्यांवर खुप विचार करून देशातील तरुणांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या महत्त्वाकांशी योजनेचा शुभारंभ केला आहे .

"स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया" योजनेच्या काही महत्वाच्या घोषणा...

  • स्टार्ट अप’साठी नऊ कामगार कायदे आणि पर्यावरण कायद्यांमध्ये ‘सेल्फ सर्टिफिकेशन’ लागू होणार.
  • तीन वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारची सरकारी पाहणी (इन्स्पेक्‍शन) होणार नाही
  • ‘स्टार्ट अप इंडिया हब’ सुरू करणार. सरकारशी संपर्कासाठी हे केंद्र असेल.
  • सरकार मित्र, सहकारी या नात्याने काम करेल. त्यासाठी ‘हॅंड होल्डिंग’ (मदतीचा हात देणारी) व्यवस्थेवर भर असेल.
  • एका दिवसात ‘स्टार्ट अप’ सुरू करता यावे मोबाईल ऑप करणार. याद्वारे छोटेखानी आणि सुटसुटीत अर्ज करता येईल.
  • बौद्धिक संपदेच्या (इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टी) संरक्षणासाठी सरकार कायदेशीर मदत करेल.
  • पेटंट मिळविण्यासाठीची नोंदणी निःशुल्क करण्याचा सरकार प्रयत्न करेल.
  • ‘स्टार्टअप’ अंतर्गत पेटंट अर्ज सादर करण्याच्या शुल्क ८० टक्‍क्‍यांची घट.
  • ‘स्टार्टअप’ उद्योगांमार्फत सरकारने खरेदी करावी यासाठी नियमांमध्ये बदल होणार.
  • उद्योग बंद करण्यासाठीची (एक्‍झीट) सरकारी व्यवस्था वेगवान करणार. ९० दिवसांत एक्‍झिट करण्यासाठी नवा कायदा आणणार.
  • ‘स्टार्टअप’ उद्योगांना भांडवली लाभ करात (कॅपिटल गेन टॅक्‍स) सूट मिळेल.
  • ‘स्टार्टअप’ उद्योजकांना तीन वर्षे प्राप्तिकरातून सूट असेल.
  • महिला उद्योजकांची वाढती संख्या पाहता, त्यांच्यासाठी सरकार स्वतंत्र नवी योजना आणणार.
  • नव्या कल्पनांना पाठबळ देण्यासाठी ‘अटल इनोव्हेशन मिशन’ सुरू करणार
  • ‘स्टार्टअप’ला सरकार बीज भांडवल देणार
  • ‘स्टार्टअप’च्या आर्थिक सहाय्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा पत हमी निधी स्थापन करणार.
  • खासगी-सरकारी भागीदारीतून इन्क्‍युबेटर्स तयार करणार
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी शोधकार्याचे प्रकल्प राबविणार. याअंतर्गत दहा लाख विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार.
  • ‘स्टार्टअप’ प्रसारासाठी नियमित कार्यक्रम राबविले जाणार. 
तर असा हा  शासनाचा तरुण उद्योजकांसाठी अत्यंत चांगला उपक्रम आहे , असा उपक्रम ही काळाची गरज आहे.

Friday, January 1, 2016

नमस्कार मित्रांनो ,
                   !! नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा. !!!
                  माझ्या विचारांना व्यक्त करण्यासाठी , "मुक्त संचार" हा ब्लॉग लिहिण्याचा संकल्प मी २०१६ च्या पहिल्या दिवशी करत आहे. मुक्त संचार मधून मी राजकीय , सामाजिक तसेच माझे स्वताचे अनुभव , काल्पनिक कथा, कविता ह्या वर भाष्य करणार आहे. सदर विषया बद्दलचे लिखाण  हे माझे वैयक्तिक मत/ विचार असणार आहेत.
                 लिखाण मराठीत असल्या कारणाने मराठी व्याकरण चुकण्याची शक्यता आहे, तरी चूका टाळून  साध्या भाषेत लिहिण्याचा मी प्रयत्न करेन.